कोकणातील काजू बियांचा भाव घसरला ; काजू बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त...

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः  हवामानात होणारे सातत्याने बदल, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा कोकण परिसरात काजूचे उत्पन्न हवे तसे शेेतकरी वर्गाच्या हाती न लागल्याने काजू बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे बोलले जात आहे. 

पनवेल तालुक्यासह तळा, माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, लांजा, वेंगुर्ला, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, रत्नागिरी, पोलादपूर आदी परिसरात काजूची लागवड मोठ्या प्रमाणवर  आहे. वरील परिसरात काही ठिकाणी वरकस जमिनीवर काजू लागवड मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळते तर काही ठिकाणी मोठमोठे फार्म शेतकरी वर्गाने सुनियोजन करून आपल्या मेहनतीच्या जोरावर उभे करून त्यातून मिळणार्या वार्षिक उत्पन्नावर त्या शेतकरी वर्गाची उपजिवीका चालत असते.
वरील अनेक ठिकाणी काजूची ओली बी (कोवळी) मार्च ते एप्रिल या महिन्यात बहुतांशी राखणदार न मिळाल्याने चोरीला जाते. ठरलेली सुकलेली बी ही शेतकरी वर्गाच्या हाती लागते. सुकलेले बी ही गोळा करण्यासाठी शेतकरी वर्गाच्या प्रती दिवशी मजूर लावून गोळा करावी लागते. त्यानंतर त्याला कडक ऊन देवून ती विक्रीस दिली जाते. साधारण वेंगुर्ला सात या व वेंगुर्ला चार या बीला शेतकरी वर्गाला चांगला भाव मिळतो. परंतु अन्य बीमध्ये अनेक वेळा पोची बी व वजनाला हलकी बी चे उत्पन्न रायगड जिल्ह्यात जास्त प्रमाणात यावर्षी हाती आल्याने शेतकरी बागायतदार चिंतातूर झाला आहे.
या बियांना व्यापारी खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे रायगड तसेच वरील अनेक तालुक्यात काजू सुकी बी पडून आहे. या बियांचा भाव अजूनही खाली येण्याची दाट शक्यता आहे. कृषी खात्याचे अधिकारी कोकण तसेच वरील अनेक तालुक्यात काजूचे शेतकरी वर्गाला भरघोस व चांगले उत्पादन येण्यासाठी मार्गदर्शन तसेच शासकीय मदत या पासून वंचित ठेवीत असल्यानेच शेतकररी वर्गावर ही वेळ येत असल्याने चिंताग्रस्त काजू बागायतदार व शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून कृषी खात्याला योग्य त्या सूचना देवून काजू उत्पादन घेणार्या शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी चिंतातूर शेतकरी करीत आहेत.
Comments