विकेंड लॉकडाऊन मध्ये एक हजार दोनशे एकवीस जणांवर कारवाई, दोन लाख तेरा हजारांचा दंड वसूल


पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः कोरोनाने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन केला होता. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मध्ये पोलीस प्रशासनाने वीकेंड लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करणार्‍या बाराशे 21 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मध्ये दहा पोलिस स्टेशनचा समावेश होतो. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दहा पोलीस स्टेशनमध्ये साडेतीनशे पोलीस कर्मचारी आणि शंभरहून अधिक पोलिस अधिकार्‍यांची नियुक्ती नाकाबंदी साठी केली होती. विकेंड लॉक डाऊनच्या दिवशी अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 10 आणि 11 एप्रिल रोजी प्रशासनाने बाराशेहून अधिक नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन, मॉर्निंग आणि इवनिंग ऑफ करणारे नागरिक, मास्क न लावणारे नागरिक, सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सामाजिक अंतर आणि इतर आरोग्यविषयक खबरदारी न घेता चालू ठेवलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तसेच लॉक डाऊन कालावधीत ठरवून दिलेल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्यामुळे, अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर आणि आस्थापना विहित वेळेत बंद न केल्याबाबत कारवाई करण्यात आली. 

कोरोनामुळे राज्य शासनाने विकेंड लॉकडाउनचे आदेश दिलेले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असे शिवराज पाटील- पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2 कडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
Comments