मिनेश गाडगीळ राज्य शासनाच्या ' कृषिभूषण ' पुरस्काराने सन्मानित...


राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान 
पनवेल(प्रतिनिधी) : - पनवेलसह रायगड जिल्ह्याला अभिमान वाटेल असे शेतीमधील नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणारे प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांना राज्य शासनाकडून सेंद्रिय शेती करिता 'कृषिभूषण २०१९' पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
            महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे समारंभपूर्वक पार पडलेल्या या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम, नरहरी झिरवळ आदी मान्यवर तसेच राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
            मिनेश गाडगीळ पनवेल तालुक्यातील गुळसुंदे गावचे उच्चशिक्षित ग्रामस्थ आहेत. उच्चशिक्षित युवक असतानाही त्यांनी शेती विषयी आत्मीयता ठेवली. आणि ते शेतीतील विविध प्रयोग करू लागले आणि त्याचा परिपाक म्हणून शेतीसंशोधक व प्रगतीशील शेतकरी म्हणून ते उदयास आले. शेतीतील विविध प्रकल्प त्यांनी सातत्याने राबविलेले आहेत. त्यामुळे त्यांचा या पूर्वीही विविध पुरस्काराने गौरव झाले आहेत.  रासायनिक खतांच्या अती वापरामुळे जमीन आणि मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. परदेशातील शेतीप्रमाणे आपल्याकडेही केमिकलमुक्त शेती झाली पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सोहळ्यात अधोरेखित केले होते. मात्र  त्या अनुषंगाने सेंद्रिय प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर व काम्पोस्ट इनहॅन्सर ही मिनेश गाडगीळ यांनी संशोधित केलेली नैसर्गिक घटकांपासुन बनवलेली मुलद्रव्ये आपल्याकडे उपलब्ध झाली आहेत, वनस्पतींना आवश्यक प्रोटीन देणयाबरोबरच किड नियंत्रणाचा हे काम हि द्रव्ये करत असल्याने शेतीमध्ये अत्यंत उपयोगी ठरली आहेत. शेती आणि मानवी स्वास्थ याचा विचार करता मिनेश गाडगीळ यांचे संशोधन अत्यंत फलदायी आणि उपयुक्त ठरले आहे, त्यामुळे सेंद्रिय तंत्रज्ञानाचा अवलंब व प्रसार करून कृषि क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल मिनेश मोहन गाडगीळ यांना कृषिभूषण सेंद्रिय शेती या पुरस्काराने सपत्निक गौरविण्यात आले आहे. 

कोट- 
रासायनिक खतांचा शेतीत अती वापरामुळे शेती नापिक होत असते आणि त्याचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसत आहे. आणि त्याला पर्याय म्हणून सेंद्रिय प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर ही नवी संकल्पना राबवली आहे.  ज्या मध्ये गोमूत्र व पाल्याच्या रसाचा वापर करुन सेंद्रिय प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर व काम्पोस्ट इनहॅन्सर हि द्रव्य बनवलेली आहेत. त्याची फवारणी केल्यास सर्व न्युट्रीयंटस पिकांना मिळतात व किडनियंत्रण ही होते. आणि मिळणारे पीक हे केमीकल रेसिड्युव्ह मुक्त असते. - मिनेश गाडगीळ, प्रगतीशील शेतकरी व शेती संशोधक (संपर्क- ९८२२५७४८५४)
Comments