रेल्वे पोलिसांमुळे मिळाली दागिन्यांची बॅग..
रेल्वे पोलिसांमुळे मिळाली दागिन्यांची बॅग

पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) :   रेल्वेत विसरलेली दागिन्यांची बॅग अज्ञात व्यक्ती व रेल्वे पोलिसांमुळे परत मिळाली आहे. कामोठे येथे राहणाऱ्या व्यक्तीचे त्यात अडीच लाखांचे दागिने होते. हा ऐवज परत मिळाल्याने त्यांच्यावरील मोठं आर्थिक संकट टळले आहे.
                
कामोठे येथे राहणाऱ्या गोविंद जगताप यांच्यासोबत हा प्रकार घडला. ते सुमारे अडीच लाखांचे दागिने घेऊन कुर्ला येथून रेल्वेने कामोठेला येत होते. परंतु मानसरोवर स्थानक येताच घाईमध्ये ते बॅग बाकड्यावरच विसरून रेल्वेतून उतरले. घरी गेल्यानंतर त्यांना आपण दागिन्यांची बॅग विसरलो असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांच्या मुलांना कळताच मुलगा स्वप्निल जगताप याने तात्काळ मानसरोवर स्थानकात येऊन रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी स्थानकात उपस्थित महिला रेल्वे पोलीस सुजाता साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बाब पनवेलसह सर्व स्थानकातील रेल्वे पोलिसांना कळवून संबंधित रेल्वे परत जाताना त्यामध्ये बॅग शोधण्यास कळविले. याचदरम्यान एका व्यक्तीने पनवेल स्थानकात ही बॅग रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली. बॅग तपासली असता तो सुस्थितीत आढळून आला. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नामुळे अडीच लाखांचे दागिने परत मिळाले.
Comments