कर्नाळा किल्ल्यावर तीन महिन्यांपासून बंदी कायम ; धोकादायक बांधकाम दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष
धोकादायक बांधकाम दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष..


पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :- इतिहासाचा साक्षीदार असलेल्या कर्नाळा किल्ल्यावर काही प्रमाणात बांधकाम धोकादायक झाल्याने तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. मात्र वनविभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. परिणामी किल्ल्यावर जाण्यास अद्यापही मनाई आहे. या कारणाने गिर्यारोहक, पर्यटक आणि इतिहास प्रेमींमध्ये निराशाचे वातावरण आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
                   पनवेलपासून 12 कि.मी अंतरावर कर्नाळा अभयारण्य परिसरात उंचावर 1248 साली  कर्नाळा किल्ला बांधण्यात आला. देवगिरीच्या यादवाचा सुरूवातीला त्याच्यावर अमल होता. त्यानंतर मुघलांनी हा किल्ला सर केल्याचे इतिहास काही प्रमाणात दाखले देतोय. 1582 दरम्यान या ठिकाणी निजामशाही होती. मात्र वसईच्या कॅप्टनने 300 युरोपियन सैन्याचा वेढा टाकून ही प्राचीन वास्तु काबीज केली. पोर्तुगिजाने 1750 पौंडाचा बदल्यात तो पुन्हा निजमाला बहाल केला. या किल्ल्यांचे अनन्य साधारण असे महत्व लक्षात घेता मुघलांनी काही काळ राज्य केले . 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा  किल्ला जिंकून त्याचा स्वराज्यात समावेश करून घेतला. पुरंदरच्या तहात मिर्झा राजा जयसिंगाने  इतर गडांबरोबर कर्नाळयाचाही बळी घेतला. मात्र नंतर पुन्हा हा ऎतिहासिक ठेवा हिंदवी स्वराज्यात समील झाला. पुढे औरंगजेबाने या किल्ल्याला पुन्हा पारतंत्र्याच्या साखळदंडात जेरबंद केले. 1740 साली पेशवांनी पुन्हा कर्नाळा सर केला. 1803मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवाने राज्याबरोबर हा किल्ला सुध्दा गमवला. इंग्रजांनी कर्नाळयावर स्वःता अंमल केला, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. एकंदरीत ऎतिहासिक दृष्टया अतिशय जुना आणि महत्वाचा असलेला हा अनमोल ठेवा भौगलिकदृष्टया त्या काळात उपायुक्त होता. याचे महत्वाचे कारण म्हणजे कर्नाळयावरून मुरूंड जंजिरा, अलिबाग, रायगड, घाटमाथा, मुंबई या सर्व गोष्टी पहाता येत होत्या. आणि आजही त्या वर गेल्यावर दिसतात. पनवेलला मोठी बाजारपेठ व मिठागरे, बंदर असल्याने टेहळणी करीता कर्नाळा किल्ला अतिशय महत्वाचा समजला जात होता. याच परिसरात घनदाट झाडे आणि पक्षांच्या सानिध्यात त्याचबरोबर  कर्नाळा हा इतिहासाची साक्ष्य देणारा उंचावर किल्ला असल्याने अनेक पर्यंटक व गिर्यारोहक व इतिहास प्रेमी या ठिकाणी येतात. मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणाहून अनेकजण सुट्टी किंवा वेळ मिळेल तेव्हा कर्नाळ्यात येतात. दरम्यान कर्नाळा किल्ल्यावरील एका ठिकाणी बांधकाम नादुरुस्त अवस्थेत आहे.नुकताच उपवनसंरक्षक यांनी सहाय्यक वनसंरक्षकांबरोबर कर्नाळा अभयारण्य परिसराचा दौरा केला. तेव्हा पर्यटकांच्या दृष्टिकोनातून किल्ल्यावरील बांधकाम धोकादायक असल्याने येथे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान हे बांधकाम त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते. मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना किंवा हालचाल न झाल्याने कर्नाळा किल्ल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. इतिहासाचा साक्षीदार सध्या एकांत वासात असल्याचे दिसून येत आहे.

चौकट
उपायोजना करून किल्ल्यावर प्रवेश द्या!
कर्नाळा अभयारण्य परिसरात प्रवेश शुल्क घेण्यात येते. परंतु किल्ल्यावर जाण्यास मनाई असल्याने अर्धा तासातच पर्यटकांना परतावे लागते. परिणामी त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटतो. या सर्व पार्श्वभूमीवर वनविभागाने त्वरित उपाययोजना करून कर्नाळा किल्ल्यावर प्रवेश द्यावा अशी मागणी
ग्राम परिस्थितीकी विकास समिती कल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.


फोटो - कर्नाळा किल्ला
Comments