महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या .....

स्मिता जाधव, विजय कादबाने, संदिपान शिंदे, अर्जुन गरड ठाण्यात....

शत्रुघ्न माळी रायगड पोलीस दलामध्ये
भागुजी औटी यांना मुदतवाढ.....

पनवेल दि. १७ ( वार्ताहर ):- महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एक कमी साडेचारशे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नवी मुंबईतील 14 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्मिता जाधव, विजय कादबाने, संदिपान शिंदे , अर्जुन गरड यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना गृह विभागाने ठाणे शहरात काम करण्याची संधी दिली आहे. तर शत्रुघ्न माळी यांची रायगडला बदली करण्यात आले आहे.

गृह विभागाने कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि विनंती बदल्यांचे आदेश शुक्रवारी निर्गमित केले. नवी मुंबई पोलीस दलात सहा वर्ष पूर्ण झालेल्या 14 अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, उरण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदिपान शिंदे, आणि लेडी सिंघम पोलीस ऑफिसर स्मिता जाधव यांचा समावेश आहे. गुन्हे अन्वेषणाचे आणि प्रगटीकरण यामध्ये हातखंडा असणाऱ्या कादबाने आणि शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा मध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विजय कादबाने यांनी सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून अतिशय उजवे काम केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. त्यांच्या कामाचे सिडको प्रशासनाने ही कौतुक केले. त्याचप्रमाणे संदिपान शिंदे यांनी सुद्धा खारघर आणि उरण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून छाप पडली. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदाला स्मिता जाधव यांनी न्याय दिला. त्याचबरोबर गुन्हे शाखेत काम करत असताना अर्जुन गरड यांनीही आपल्या कार्यक्षमतेचा प्रत्यय नवी मुंबईकरांना दिला. शत्रुघ्न माळींनी सुद्धा नवी मुंबईत प्रभावी काम केले. त्यांच्याबरोबरच नितीन गीते, वाहन चालकांना शिस्त लावणारे निशिकांत विश्वकर, भारत कामत, बापूराव देशमुख, राजू सोनवणे, विजय वाघमारे, दत्तात्रय शिंदे, प्रमोद पवार या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही आपली कर्तव्य दक्षता दाखवून दिली. भागुजी औटी यांना शासनाने मुदत वाढ दिली आहे.

घनश्याम आढाव, औदुंबर पाटील नवी मुंबईमध्ये!

कार्यक्षम, कार्यतत्पर त्याचबरोबर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून घनश्याम आढाव यांनी आतापर्यंत काम केले आहे.  पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आजही पनवेलकरांच्या स्मरणात आहे. ठाणे ग्रामीण मध्येही त्यांनी आपल्या कार्य कुशलतेचा ठसा उमटवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून घनश्याम आढाव यांना काम करण्याची संधी राज्य सरकारने दिली आहे. त्याचबरोबर औदुंबर पाटील या कार्यक्षम अधिकाऱ्याची ही नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रकाश सपकाळ, संजय बेंडे, प्रवीण भगत, राजकुमार कोथिंबीर, बापू ओवे, नितीन ठाकरे, गुलफरोज मुजावर, जितेंद्र मिसाळ, संजय पाटील, सुरज पाटील आबासाहेब पाटील यांची सुद्धा नवी मुंबई पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments