ओडिसा रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची अभिजीत पाटील यांनी केली मागणी....
 अभिजीत पाटील यांनी केली मागणी....


पनवेल दि.०५ (वार्ताहर) : ओडिसा येथे घडलेला रेल्वे अपघात हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे. ही घटना मन हेलावणारी आहे. या अपघाताच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या प्रवासी वर्गावर हा मोठा आघात आहे. त्यामुळे रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये व जखमींना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारने द्यावी, अशी मागणी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अभिजीत पाटील यांनी केली आहे.
            ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रूळावर आल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात जवळपास ३०० प्रवाशांचा मृत्यू व ९०० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिजीत पाटील पुढे म्हणाले रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सुरक्षित समजला जातो. ओडिशा येथील ही घटना अत्यंत मन हेलावणारी असून केंद्र सरकारने बसवलेली 'कवच' यंत्रणा त्याठिकाणी सपशेल कुचकामी ठरल्याचे दिसून येते. या घटनेची सखोल चौकशी करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिजीत पाटील यांनी केली.  
फोटो : अभिजित पाटील
Comments